बांगलादेशातल्या हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा तर द्यावा लागलाच, शिवाय तातडीने देशही सोडावा लागला. घाईघाईतच बांगलादेशच्या हवाई दलाच्या सी-130J हरक्युलिस विमानानं त्या भारतात दाखल झाल्या. दिल्लीजवळच्या हिंडन एअरबेसवर त्यांचं विमान उतरलं. शेख हसीना यांचं विमान तिथल्या सेफ हाउसमध्ये आहे. तिथेच ते पार्क करण्यात आलंय; मात्र बांगलादेशचं आणखी एक विमान गेल्या नऊ वर्षांपासून भारतात धूळ खात पडलं आहे. अनेक वेळा सांगूनही बांगलादेशाने ते विमान परत नेलं नाही. विमानतळ प्राधिकरण आता या विमानाचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
या विमान प्रकरणाची सुरुवात 2015 साली झाली. युनायटेड एअरवेज बांगलादेशचं मॅकडॉनल डग्लस (MD) 83 हे विमान सात ऑगस्ट 2015 रोजी ढाक्यामधून मस्कतसाठी रवाना झालं. त्या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 176 जण होते. विमानाचं उड्डाण झाल्यावर काही मिनिटांमध्येच वैमानिकाला काही विचित्र आवाज ऐकू आले. काय झालंय हे कळायच्या आतच विमानाचं इंजिन निकामी झालं. तोपर्यंत विमानानं भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. विमानातलं इंजिन इतकं खराब झालं होतं, की त्याचा एक भाग छत्तीसगडच्या राजधानीचं शहर असलेल्या रायपूरपासून 90 किलोमीटर अंतरावर एका ठिकाणी पडला.
रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
वैमानिकांना नागपूर व रायपूर हे सगळ्यात जवळचे विमानतळ असल्याचं दिसलं. लगेचच त्यांनी या दोन्ही विमानतळांच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी (ATC) संपर्क साधला. त्यांना सगळा प्रकार सांगून तात्काळ लँडिंगची परवानगी मागितली. रायपूरकडून लगेचच परवानगी मिळाली. त्यामुळे 176 प्रवाशांसह ते विमान सुरक्षितरीत्या लँड होऊ शकलं. त्या विमानातल्या प्रवाशांना दुसऱ्या दिवशी वेगळ्या विमानानं मस्कतला पाठवण्यात आलं.
बांगलादेशाचं हे विमान हँगरमध्ये पार्क करण्यात आलं. काही दिवसांनंतर विमानाच्या दुरुस्तीसाठी ढाक्यामधून एक पथक आलं. त्यांनी बऱ्याच अंशी विमान दुरुस्त केलं; पण ते विमान परत घेऊन गेले नाहीत.
ना ई-मेलला उत्तर, ना पत्राला
बांगलादेशातल्या या विमानासाठी रायपूर विमानतळावर एक भाग राखीव ठेवून ते तिथेच पार्क करण्यात आलं. काही महिने झाल्यानंतरही बांगलादेशातल्या अधिकाऱ्यांनी त्या विमानाची कोणतीच चौकशी केली नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं बांगलादेशाशी संपर्क साधला. त्यांना विमान परत नेण्यास सांगितलं; मात्र त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. गेल्या नऊ वर्षांत या विमानाबाबत ई-मेलद्वारे, तसंच विविध माध्यमांद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न झाला; पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
रायपूर विमानतळावरच्या अधिकाऱ्यांच्या मते, आता बांगलादेशच्या या विमानाच्या पार्किंगचं भाडं चार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. विमानतळाला इतकं भाडं वसूल करणं अवघड आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ते विमान नुसतंच धूळ खात पडून असल्यानं आता ते उड्डाण करण्याइतकं सक्षम राहिलं नाही. बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना अनेक ई-मेल्स व पत्रंही पाठवली; पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. आता आम्ही कायदे विभागाकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल, असं रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळाचे संचालक डॉ. एस. डी. शर्मा यांनी म्हटलं आहे. कायदा विभागाच्या सल्ल्यानुसार या विमानाबाबत विमानतळ प्राधिकरणाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.