नेमके घडले कसे?
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब माने (राहणारा अडवली ढोकळी, कल्याण पूर्व) हे नोकरदार असून गेल्या आठवड्यात ते डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कामानिमित्त आले होते. ते आपल्या भावाची रिक्षा घेऊन रुग्णालयात गेले होते. दुपारच्या सुमारास परत जात असताना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पी.पी. चेंबर्स मॉलसमोर दोन व्यक्तींनी त्यांची रिक्षा थांबवली.
advertisement
आम्हाला निळजे येथील लोढा हेवन येथे जायचे आहे असे सांगून त्यांनी रिक्षेत बसण्याचा हट्ट केला आणि ते त्या रिक्षात बसले. मात्र आपण रिक्षाचालक नसल्याचे माने यांनी सांगितले तरीही दोघांनी जबरदस्तीने त्यांना तेथे जाण्यास सांगितले. निळजे येथील शिवाजी चौक परिसरात पोहोचल्यानंतर त्या दोघांनी शीतपेयाच्या बाटल्या आणल्या आणि त्यामधील एका बाटलीत त्यांनी गुंगीचे औषध मिसळले होते.
माने यांनी शीतपेय पिण्यास नकार दिला तरीही जबरदस्तीने त्यांना ते पाजण्यात आले. त्यानंतर त्यांना गुंगी आली आणि पुढे काय झाले ते त्यांना आठवत नाही. दरम्यान दोघांनी रिक्षेचा ताबा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे 9 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 4 ग्रॅमची अंगठी आणि मोबाईल घेऊन पळ काढला.
दोन दिवसांनी माने हे काटई नाका परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
