पालघरच्या विक्रमगड मधील सारशी या ग्रामपंचायत हद्दीतील गावकऱ्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात असलेल्या विहिरी आणि बोरवेल यांनी तळ गाठला असून पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर विहिरी भोवती पहारा द्यावा लागतोय. तरीही पुरेस पाणी मिळत नसून थोड फार मिळालेलं पाणी देखील दूषित मिळत असल्याने येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. सारशी ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यांमध्ये तीन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असून गावातील सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच गावात यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली नळपाणी योजना ही बंद असल्याने येथील महिलांना मोठी पायपीट करावी लागते.
advertisement
पुरंदर-बारामतीत दुष्काळाच्या झळा! नाझरे धरणाने गाठला तळ, जमिनीला भेगा; पाणी टंचाईचे संकट
पाणी टंचाईची भीषणता सहन करणार हे सारशी गाव धामणी आणि कवडास या धरणांपासून अवघ्या काही अंतरावर आहे. याच सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही धरणांमधून पालघरच्या पूर्व भागासह बोईसर तारापूर एमआयडीसी , वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र असताना देखील येथील स्थानिक नागरिकांना दरवर्षी एप्रिल , मे आणि जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. मागील कित्येक आठवड्यापासून येथील महिला पाण्यासाठी वणवण करत असतानाही प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्याकडून करण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पालघरच्या जव्हार , मोखाडा , विक्रमगड या भागात विक्रमी पावसाची नोंद होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या आणि सरकारच्या नियोजनातील अभावामुळे काही महिन्यातच येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने येथील गाव पाण्याची कायमची पाण्याची समस्या मिटेल अशा उपाययोजना करण गरजेच आहे. मात्र याबाबत प्रशासनाला कधी जाग येईल हाच खरा प्रश्न आहे.
