कन्नौज : वर्षाचे 12 महिने बाजारात फळं दिसतात. काही फळं दररोज मिळतात, तर काही फळं हंगामानुसार उपलब्ध असतात. त्यापैकी काही फळं तर पाहिल्या पाहिल्या खरेदी करावीशी वाटतात. बऱ्याचदा चिंच, बोरांबाबत असं होतं. मात्र पावसाळ्यात साथीचे आजार झपाट्यानं पसरत असल्यामुळे खाण्या-पिण्याबाबतचे मोह आवरणं आवश्यक आहे.
आहारात फळांचा समावेश असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ अगदी शाळकरी मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना देतात. फळांमधून भरून पौष्टिक तत्त्व मिळतात यात काहीच शंका नाही, मात्र काही फळांमुळे आरोग्य बिघडूही शकतं. बाजारात मिळणाऱ्या कापलेल्या फळांमुळे असं नक्कीच होऊ शकतं.
advertisement
हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं फळ, बाजारात मिळतं फक्त 2 महिने
अनेकदा आपण फळं घरी आणून, धुवून, कापून खातो. परंतु काहीजण मात्र बाजारातूनच फळं कापून आणतात. तर, काही दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पिकलेली फळं विविध आकारात कापून ठेवतात. ही फळं खाणं धोक्याचं ठरू शकतं. हवेतले विषाणू अन्नपदार्थांवर चटकन बसतात. उघड्यावरच्या कापलेल्या फळांवरही ते बसूच शकतात. त्यामुळे फळं लवकर सडतातसुद्धा. हीच फळं आपण खाल्ल्यास आजारी पडू शकतो.
पावसाळ्यातील दमट वातावरणात विषाणूंचा प्रादुर्भाव वेगानं होतो. याचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तरुणांच्या तुलनेत कमकुवत असते. अशात रस्त्यावरील कापलेली फळं खाल्ल्यास पोट बिघडू शकतं, जुलाब होऊ शकतात. म्हणूनच फळं खरेदी करताना काळजी घ्यावी. फळाला कुठे चीर गेलेली नाही ना, हेसुद्धा व्यवस्थित पाहावं. तसंच घरी नेल्यावर स्वच्छ धुवूनच फळांचा आस्वाद घ्यावा. डॉक्टर आतिफ यांनी ही माहिती दिली आहे.