ठाणे : आपण एमबीए चायवाला, एमबीए वडापाववाला असे सगळे प्रकार पाहिले. ठाण्यात सुद्धा आता एमबीए झालेल्या एका महिलेने आपल्या हाताच्या चवीने ठाणेकरांना प्रेमात पाडले आहे. ठाणे स्थानकापासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या काल्हेर येथे अश्विनी या महिलेचे आशुज् किचन हे भोजनालय सध्या ठाण्यात खूप प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी थाळी खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते.
advertisement
अश्विनी यांनी लग्न झाल्यानंतर लॉकडाऊन संपल्यावर नवऱ्याच्या पाठिंब्याने घरातूनच डब्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी स्वतःचे आशुज् किचन नावाने भोजनालय सुरू केले. आता त्यांच्या आशुज् किचनला चार वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यांच्या इथे मिळणाऱ्या थाळीसाठी आजही लोक सकाळ-संध्याकाळ येतात. यांच्या इथे मिळणाऱ्या या 120 रुपयांच्या व्हेज थाळीमध्ये आठ ते नऊ हून अधिक प्रकार खायला मिळतात. ज्यामध्ये डाळ, भात, दोन भाज्या, पापड, गुलाबजाम, मसाला ताक असं सगळ्यांचा समावेश होतो. या व्यवसायातून अश्विनी महिन्याला साधारण दीड लाख रुपये कमवतात.
शुन्यातून जग निर्माण करता येतं! नागरबाईंनी मसाल्यातून करुन दाखवलं, आता १५ लाखांची कमाई
जॉईंट फॅमिली असल्यामुळे एमबीए झाल्यानंतर अश्विनी यांना जॉब करायला जमलं नाही. लग्नानंतर अनेकांनी त्यांना तुम्ही छान जेवण बनवता हाताला चव सुद्धा आहे असं म्हटलं तेव्हाच त्यांनी आशुज् किचन सुरू करायचा निर्णय घेतला.
'प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी करण्याची जिद्द असते. प्रत्येकीमध्ये काहीतरी कला असतेच फक्त ती तिला कळाली पाहिजे. मला सुद्धा माझ्या या पाककलेबद्दल पूर्वी माहित नव्हतं. पण जसं कळायला लागलं की आपण बनवलेलं जेवण लोकांना आवडतंय तसं माझं आत्मविश्वास वाढत गेला' असे अश्विनी यांनी सांगितले.
अश्विनी यांच्या या आशुज् किचनमध्ये सकाळी तुम्हाला आठ ते दहा त्या वेळेत नाष्टा सुद्धा मिळेल. ज्यामध्ये उपमा, पोहे हे फक्त तुम्हाला 25 रुपयांपासून मिळतील. इथे मिळणारे सगळे जेवण हे पौष्टिक आणि हायजिन मेंटेन केलेलं असल्यामुळे लोकांची याला पसंती मिळत आहे. एमबीए करूनही व्यवसाय करण्याचे धाडस दाखवून तो व्यवसाय इतका यशस्वी पद्धतीने करणं सोपी गोष्ट नव्हे. त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायचा आहे अशा महिलांसाठी अश्विनी या उत्तम उदाहरण ठरत आहेत.