या विषयावर बोलताना बीड शहरातील डॉ. विलास राठोड सांगतात की, रात्री मोबाईलचा वापर डोळ्यांवर ताण देतो. स्क्रीनवरून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेंदूला झोपेचा सिग्नल मिळत नाही. यामुळे मेंदू अॅक्टिव्ह राहतो आणि नैसर्गिक झोपेत व्यत्यय येतो. दीर्घकाळ अशा प्रकारे झोपेचा अडथळा निर्माण झाला तर स्मरणशक्ती, निर्णय क्षमता आणि मानसिक स्थैर्यावर परिणाम होतो.
advertisement
Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात टाळा त्वचारोग, हे 4 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
किशोरवयीन मुलांमध्ये ही सवय अधिक दिसून येते. रात्री उशिरापर्यंत गेम्स, सोशल मीडिया किंवा चॅटमध्ये गुंतलेले असतात. डॉ. राठोड यांच्या मते या वयात मेंदूचा विकास सुरू असतो आणि झोपेची कमतरता मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, अभ्यासात मन लागत नाही आणि आत्मविश्वास कमी होतो.
लहान मुलांमध्येही मोबाईलचा वापर झपाट्याने वाढतो आहे. रात्री झोपण्याआधी कार्टून किंवा व्हिडिओ पाहणाऱ्या मुलांमध्ये चिडचिडेपणा, अति सक्रियता आणि झोपेचे वेळापत्रक बिघडलेले दिसते.
डॉ. राठोड यांचे म्हणणे आहे की, पालकांनी याकडे गांभीर्याने पाहावे आणि मुलांचा मोबाईल वापर मर्यादित ठेवावा. झोपेच्या एक तास आधी मोबाईल दूर ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत रात्री मोबाईल वापरण्याची ही सवय आरोग्याला हानीकारक ठरू शकते. झोपेच्या वेळेत मोबाईलचा वापर टाळून, नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवणे आणि रात्री शरीर-मेंदूला विश्रांती देणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. विलास राठोड यांनी सांगितले.