हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे आणि ऊर्जेचे स्रोत असलेले पदार्थ सेवन करणे फायदेशीर असते. गूळ, तीळ, शेंगदाणे, खोबरे, खजूर, तुपाचे पदार्थ हे शरीराला उष्णता देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात. याशिवाय हिवाळ्यात बनवल्या जाणाऱ्या तिळगुळाच्या लाडव्यासारख्या पारंपरिक पदार्थांमुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम, लोह आणि ऊर्जा मिळते. हे पदार्थ केवळ शरीर गरम ठेवत नाहीत तर हाडे आणि स्नायूही मजबूत करतात.
advertisement
Diwali 2025 : दिवाळीला फराळ बनवताय? पदार्थ तेलात की तुपात तळलेले चांगले? महत्त्वाच्या टिप्सचा Video
या दिवसांत ताजी फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे विशेष महत्त्वाचे ठरते. संत्री, मोसंबी, डाळिंब, पपई यामध्ये जीवनसत्व ‘C’ मुबलक प्रमाणात असल्याने ते प्रतिकारशक्ती वाढवतात. गाजर, बीट, पालक, मेथी, गवार यांसारख्या भाज्या शरीराला लोह आणि फायबर देतात आणि रक्तशुद्धी करून शरीर ताजेतवाने ठेवतात. त्यामुळे हिवाळ्यातील आजार टाळण्यासाठी भाज्या आणि फळांचा आहारातील हिस्सा वाढवणं गरजेचं आहे.
हिवाळ्यात उबदार पेयांचे सेवनही खूप फायदेशीर ठरतं. आलं-तुळशीचा काढा, हळदीचं दूध, सूप यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. विशेष म्हणजे हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून अनेकजण पाणी कमी पितात. मात्र पुरेसं पाणी पिणं तितकंच आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राहिलं तर त्वचा, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती सर्व व्यवस्थित कार्य करतात.
याशिवाय बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते यांसारख्या सुका मेव्यामध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स आणि जीवनसत्व ‘E’ असतं. हे हृदयासाठी, मेंदूसाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हिवाळ्यात रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा. एकूणच, हिवाळ्यातील थंडीमुळे आजार होऊ नयेत यासाठी संतुलित आहार, उबदार पेय, पुरेसं पाणी आणि पौष्टिक पदार्थांचा योग्य समतोल साधल्यास शरीर निरोगी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.