आज जगभरात लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे गंभीर आजारांचा धोका वाढत चाललाय. ताज्या आकडेवारीनुसार, जगभरातील सुमारे 31 टक्के प्रौढ, म्हणजे सुमारे 1.8 अब्ज नागरिक, आवश्यक शारीरिक हालचाल करू शकत नाहीत असं आढळून आलंय. यामुळे, येत्या काळात हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढणार आहे.
2010 ते 2022 दरम्यान शारीरिक निष्क्रियतेत अंदाजे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे ही चिंताजनक बाब आहे. हा दर असाच चालू राहिला तर 2030 पर्यंत हा आकडा 35 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
advertisement
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढांनी आठवड्यातून किमान दीडशे मिनिटं मध्यम किंवा 75 मिनिटं जोरदार शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. पण हे कळून त्याप्रमाणे क्रियाशील होणाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह, डिमेंशिया आणि स्तन आणि आतड्यांचा कर्करोग यासारख्या आजारांचं प्रमाण वाढतंय.
Skin Cancer : मेलेनोमा म्हणजे काय ? मेलेनोमाची लक्षणं कशी ओळखायची ?
भारतातील परिस्थिती देखील अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या दोन दशकांत देशात लठ्ठपणा वेगानं वाढला आहे, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार, भारतातील जवळजवळ चार प्रौढांपैकी एक लठ्ठ आहे. म्हणूनच वजन वाढणं आणि त्यासंबंधित आजार भारतात एक silent killer बनत आहेत. काही राज्यांमधे लठ्ठपणाचं प्रमाण आठ टक्के आहे, तर काही ठिकाणी ते प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अभ्यासानुसार, देशातील लाखो लोक स्थूलता आणि उच्च (high) कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. गेल्या पंधरा वर्षांत भारतात जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांची संख्या दुप्पट झाली आहे, तर गेल्या तीस वर्षांत ती तिप्पट झाली आहे.
सर्वात जास्त चिंता वाढवणारी बाब म्हणजे भारतात 1.44 कोटींहून अधिक मुलं लठ्ठ आहेत, ज्यामुळे भविष्यात आरोग्य संकट आणखी वाढू शकतं. डॉक्टरांच्या मते, लठ्ठपणा हा केवळ वजन वाढण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्लीप एपनिया आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. पोटाभोवती चरबी जमा होणं हे प्रकृतीसाठी धोकादायक आहे.
Health Tips : ऋतू बदलाचा त्रास होतो ? योगाभ्यासातल्या उपायांनी करता येईल मात
भारतातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या पुरेसा व्यायाम करत नाही असं WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणात आढळून आलं आहे. कोविड-19 साथीमुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि स्क्रीन टाइम वाढला आहे.
आपली बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी या वाढत्या समस्येचं एक प्रमुख कारण आहेत. शहरीकरण, जास्त वेळ बसून काम करणं, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाणं आणि फास्ट फूडचा वाढता वापर या सर्वांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे दिनचर्येत आवश्यक बदल करणं प्रकृतीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
