पैठण येथील जायकवाडी धरणाचे क्षेत्रफळ जवळपास 35 हजार हेक्टर असून सध्या या धरणात 29.65 टक्के टीएमसी पाणीसाठा आहे. या जलमय वातावरणाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, विशेष म्हणजे सेल्फी काढण्यासाठी अनेकांची लगबग सुरू असते. पण, हीच सेल्फी काढण्याची हौस कधीकधी जीवावर बेतू शकते. त्यामुळे पैठण धरणावर सेल्फी काढताना आपण काही महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
सेल्फी पॉइंटवर काय काळजी घ्यावी
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधीही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढू नका. जिथे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे, जिथे पाय घसरण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जाणे टाळा. अनेकदा काही उत्साही तरुण किंवा पर्यटक पाण्याच्या अगदी जवळ जाऊन, कठड्यावर चढून किंवा धोकादायक कड्यावर उभे राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो आणि आपला जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे आपली सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. सेल्फी घेताना नेहमी सुरक्षित अंतर ठेवा. धरणाच्या कठड्यावर चढू नका किंवा रेलिंगवरून पुढे झुकू नका. निसरड्या जागा, खडकाळ भाग किंवा पाण्याच्या जवळच्या जागा टाळा. प्रशासनाने लावलेले 'धोकादायक क्षेत्र' किंवा 'सेल्फी घेण्यास मनाई' असे फलक गांभीर्याने घ्या.
आपल्यासोबत मित्र-मैत्रिणी किंवा कुटूंब असतील, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आपलीच आहे. एकाने सेल्फी काढताना, दुसऱ्याने लक्ष ठेवावं. शक्य असल्यास, ग्रुपमध्ये फोटो काढताना कुणालाही जास्त पुढे जाऊ देऊ नका. पैठण धरण खरंच खूप सुंदर आहे, पण या सौंदर्याचा अनुभव घेताना आपण आपली आणि इतरांची सुरक्षा विसरून चालणार नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगून पावसाळा या ऋतूचा आनंद घ्या जेणेकरून अपघात होणार नाही.





