आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण डाएट करतो किंवा आरोग्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग करतो, पण धार्मिक उपवासांचे स्वरूप यापेक्षा कितीतरी पटीने वेगळे आणि आध्यात्मिक आहे. प्रत्येक धर्मात उपवासाचे स्वतःचे वेगळे नियम आणि महत्त्व आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की कोणत्या धर्मात उपवासाचे सर्वात कठोर नियम पाळले जातात?
1. जैन धर्म: आत्मशिस्तीची पराकाष्ठा
advertisement
जैन धर्मात उपवासाला अत्यंत उच्च स्थान आहे. येथील व्रत केवळ अन्नाचा त्याग नाही, तर तो आत्मशुद्धीचा मार्ग मानला जातो.
संथारा: ही जगातील सर्वात कठीण प्रथांपैकी एक मानली जाते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर व्यक्ती स्वेच्छेने अन्न आणि जल दोन्ही सोडून देते.
चौविहार: यात सूर्यास्तानंतर पाणीही पिणे वर्ज्य असते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उपवास सुटतो.
पर्युषण: या काळात 8 ते 10 दिवस कडक उपवास केले जातात, ज्याचा उद्देश शारीरिक गरजांपासून मनाला मुक्त करणे हा असतो.
2. हिंदू धर्म: श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक
हिंदू धर्मात उपवास हा प्रदेश आणि देवतेनुसार बदलतो. काही उपवास केवळ सात्विक आहाराचे असतात, तर काही अत्यंत कडक
निर्जला एकादशी: हे सर्वात कठीण व्रत मानले जाते. यात 24 तास अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही घेतला जात नाही.
करवा चौथ आणि छठ पूजा: या व्रतांमध्ये महिला आणि भाविक दीर्घकाळ 'निर्जळी' राहतात.
नवरात्री: अनेक भाविक सलग 9 दिवस केवळ फलाहारावर किंवा अत्यंत मर्यादित शाकाहारी अन्नावर राहून शक्तीची उपासना करतात.
3. इस्लाम: संयमाचा 'रमजान'
इस्लाममध्ये 'रोजा' हा पाच प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे.
पवित्र महिना: रमजानच्या काळात भल्या पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत रोजा करणारा काहीही खात किंवा पीत नाहीत.
कालावधी: चंद्राच्या कॅलेंडरनुसार हा उपवास सलग 29 किंवा 30 दिवस चालतो. हा काळ केवळ भुकेचा नसून तो संयम, प्रार्थना आणि दातृत्वाचा मानला जातो.
4. ख्रिश्चन धर्म: प्रायश्चित्त आणि त्याग
ख्रिश्चन धर्मात उपवास हा विनम्रता आणि प्रार्थनेचा भाग आहे.
लेंट (Lent): इस्टरच्या 40 दिवस आधी हा काळ सुरू होतो. यात ख्रिस्त बांधव आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा किंवा सुखसोयींचा त्याग करतात.
ब्लॅक फास्ट: ही जुनी आणि कडक पद्धत होती, ज्यामध्ये भाविक दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचे आणि मांस, दूध किंवा अंडी पूर्णपणे टाळायचे.
5. शिख धर्म: सेवा हाच खरा उपवास
इतर धर्मांच्या तुलनेत शिख धर्मात शरीराला उपाशी ठेवण्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. शिख दर्शनानुसार, केवळ शरीर उपाशी ठेवून आध्यात्मिक प्रगती होत नाही. त्याऐवजी 'लंगर'च्या माध्यमातून गरजूंना अन्न देणे, सिमरन करणे आणि करुणेने वागणे यालाच खरा धर्म मानला गेला आहे. संतुलित जीवन जगण्यावर येथे भर दिला जातो.
उपवास मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याचा मूळ उद्देश एकच आहे. स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवणे आणि मनाची शांती मिळवणे. कोणासाठी तो निर्जला आहे, तर कोणासाठी मर्यादित आहार. शेवटी, श्रद्धेच्या या वाटेवर भक्ती महत्त्वाची आहे.
