शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होत असून नगराध्यक्षपदासाठी अखेर सहा उमेदवार रिंगणात उरले आहेत. नगरसेवक पदासाठी १०० उमेदवार रिंगणात राहणार आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपाच्या रत्नमाला फलके, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या विद्या लांडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील प्रवीण काजी, तर शिवसेना शिंदे गटाच्या माया मुंडे अशा मुख्य चार प्रमुख चेहऱ्यांमध्ये लढत होणार आहे.
advertisement
या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसू शकतो.अशी चर्चा रंगली आहे.कारण भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांना पक्षाने नाकारताच त्यांनी स्वबळावर उमेदवारी दाखल करून शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. मी तीस वर्षे पक्षासाठी झटलो, केसेस झेलल्या. पण आमदारांच्या सांगण्यावरून ज्या माणसांनी कधी बीजेपीला मतदानही केले नाही अशांना तिकीट दिलं आणि मला नाकारलं, अशी तीव्र खंत अरुण मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या राजकीय नाट्यानंतरही नागरिकांचा रोष मात्र मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेवर आहे.गत ३० ते ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या कायम आहे. पंधरा दिवस पाणी येत नाही, स्वच्छतेचा अभाव, आरोग्याच्या तक्रारी, वीजपुरवठ्याचा त्रास आणि रस्त्यांची खराब स्थिती यावरून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या काळात सगळे आश्वासनं देतात… पण नंतर कुणीही परत फिरकत नाही, अशी खंत शेवगावकरांनी व्यक्त केली आहे.
महायुतीचे तीन पक्ष समोरासमोर
राज्यात सत्ता एकत्र उपभोगत असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार शेवगावमध्ये मात्र थेट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. महायुतीतच कुरघोडी आणि मतांची विभागणी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. शरद पवार गट आणि अपक्षांचे आव्हान याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आणि अपक्षही समीकरण बदलू शकतात. पण या वर्षीची निवडणूक खास करून स्थानिक प्रश्नांवरती राहण्याची शक्यता पत्रकार वर्तवत आहेत.
बंडखोरी, मूलभूत सुविधांवरील संताप, महायुतीतील संघर्ष, राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारामुळे शेवगाव नगरपालिका निवडणूक ‘हाय-व्होल्टेज’ ठरणार, असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
