काय आहे मंदिराचा इतिहास ?
संतोष बोराटे यांनी सांगितले की सुमारे 160 वर्षांपासून या देवस्थानाचे महत्त्व आहे. नाशिक येथे कुंभमेळा झाल्यानंतर त्या कुंभमेळ्यातील एक साधू महाराज परतीच्या प्रवासात असताना पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे विश्रांतीसाठी थांबले. विश्रांती घेत असताना त्यांच्या तब्येतीमुळे त्यांचा मुक्काम काही दिवसांनी वाढला. त्या काळात ते परिसरात नामस्मरण आणि साधना करत असत.
advertisement
गावातील ग्रामस्थही त्यांची मनोभावे सेवा करत होते. त्या परिसरातील आमराईतील तपभूमीत ते नेहमी नामस्मरणासाठी येत असत.दरम्यान एका दिवशी एक अनपेक्षित घटना घडली आणि हे साधू महाराज म्हणजेच नागेश्वर महाराज पुढे निघून गेले. मात्र जाताना त्यांनी त्यांच्या पादुका ग्रामस्थांना दिल्या. त्या पादुकांची ग्रामस्थांनी मंदिर बांधून स्थापना केली. तेव्हापासून नागेश्वर महाराजांची सेवा आणि पूजा ग्रामस्थांकडून केली जात आहे.
90 वर्ष अखंड दिवा प्रज्वलित...
नागेश्वर महाराजांच्या मंदिरापासून काही अंतरावरच त्यांची तपभूमी आहे. या ठिकाणी नागेश्वर महाराज नामस्मरण आणि साधनेसाठी येत असत. त्यांच्या परमभक्त नामदेव आल्हाट यांनी येथे एक दिवा प्रज्वलित केला होता. हा दिवा जर कधी विझला तर नामदेव आल्हाट यांना ते कुठेही असले तरी त्याची जाणीव होत असे आणि ते येऊन पुन्हा दिवा प्रज्वलित करत असत, अशी श्रद्धा आहे.
त्यामुळे हा दिवा कधीही विझू नये याची ते विशेष काळजी घेत असत. त्यांच्या नंतरही आल्हाट परिवार आणि ग्रामस्थांनी ही परंपरा जपली आहे. गेल्या सुमारे 90 वर्षांपासून हा दिवा अखंड प्रज्वलित असून गावकरी आणि आल्हाट परिवाराने तो कधीही विझू दिलेला नाही, अशी माहिती संतोष बोराटे यांनी दिली.





