आज लोकांच्या मनातील भावना अचूक ओळखणारे हे दोघे, एकेकाळी एकमेकांच्या मनाचा ठाव घेत होते. तब्बल 25 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला. एम.ए.चे शिक्षण घेत असताना दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. विशेष म्हणजे, प्रेमाचा प्रस्ताव सर्वप्रथम अपर्णांनीच दिला. मात्र संदीप यांनी सुरुवातीला नकार दिला. दोन दिवसांच्या विचारांती त्यांनी पुन्हा होकार दिला आणि त्यांच्या नात्याची खरी सुरुवात झाली.
advertisement
दोघांचेही इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे घरातून तीव्र विरोध झाला. अपर्णा यांचा कुटुंबीय त्यांचे लग्न ठरवण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी धाडसी निर्णय घेतला. वहिनींच्या मदतीने दोघांनी पळून जाऊन लग्न केले. सुरुवातीला विरोध असला, तरी अपर्णा यांच्या आजोबांनी पुढाकार घेत कुटुंबाला समजावले आणि अखेर दोन्ही कुटुंबांनी हे नातं स्वीकारलं. इतकंच नव्हे, तर मोठ्या थाटामाटात रिसेप्शनही देण्यात आलं.
संदीप सांगतात, “माझ्या घरातून मोठा विरोध होता. आईचा पाठिंबा होता; पण वडील आणि भावाने स्पष्ट सांगितले होते की आम्ही हवे असू तर त्या मुलीला सोड. मात्र मी अपर्णासोबत उभा राहिलो.” संघर्षाच्या काळात अपर्णा यांनी त्यांना खंबीर साथ दिली. दोघांनी मेहनत घेत आपलं करिअर घडवलं.
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात भांडणंही झाली; पण त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा मार्ग निवडला. आज 25 वर्षांनंतर ते हसत सांगतात की, “आता भांडणं होत नाहीत, झालीच तर आम्ही संवादाने सोडवतो.”
लोकांच्या मनातील जखमा भरून काढणाऱ्या या दांपत्याची स्वतःची प्रेमकहाणीही संघर्ष, विश्वास आणि समजूतदारपणावर उभी आहे. आजच्या ब्रेकअपच्या काळात, नातं टिकवायचं असेल तर प्रेमासोबत धैर्य, त्याग आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारीही तितकीच आवश्यक असते, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
