भडगाव: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भडगाव इथं गिरणा नदीत दोन मुलांना वाचवताना तरुणासह मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वाळु उपसण्याचा मुद्या पुन्हा ऐरणीवर आला आहे, नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यांमुळे दुर्घटनेचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील गिरणा नदीपात्रात दुपारी ही घटना घडली आहे. भडगाव इथं गिरणा नदीवर गावातील काही मुलं आंघोळीसाठी गेली होती. नदीपात्रात आंघोळीसाठी सगळे जण पाण्यात उतरले. काठावर पाण्याचा आनंद घेत असताना काही जण पुढे गेले. पण, पाण्याचा काही अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने काही लहान मुलं अचाानक नदीत बुडू लागली. १६ वर्षीय मुलगी काफिया शरीफ पिंजारी आणि तिच्यासह आणखी दोन मुलं पाण्यात बुडत होती. तितक्यात तिथे खान मदीन खान हा तरुण उभा होता. त्याने तिघांना बुडताना पाहिलं आणि नदीत उडी घेतली.
मुलीला वाचवताना तोही बुडाला
नदीत उडी घेतल्यानंतर खान मदीन खान याने दोन मुलांना बाहेर काढलं. त्यानंतर सोळा वर्षीय काफिया शरीफ पिंजारी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, या मुलीला वाचवत असताना तो स्वतःही तिच्यासह पाण्यात बुडाला. स्थानिकांनी आरडाओरडाा करून लोकांना बोलावलं.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलालाा देण्यात आली. पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेतली आणि मदीन आणि मुलीचा मृतदेह बाहेर काढलाा. दरम्यान, नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे मोठे खोल खड्डे तयार झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
