मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वी राज्यात आंदोलन पेटलं होतं. त्यानंतर मराठी भाषेच्या अपमानाच्या मुद्यावरून मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यावर मराठी बोलणार नसल्याचे सांगत भोजपुरी स्टारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चॅलेंज दिले होते. आता याच अभिनेत्याने भाजपात प्रवेश केला असून भाजप नेते विनोद तावडे यांनीच सूत्रं फिरवली असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
बिहारमध्ये येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्याआधी सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह याने भाजपात घरवापसी केली आहे. यामुळे भाजप आणि एनडीएला काही जागांवर फायदा होण्याची शक्यता आहे.
दक्षिण बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकालही एनडीएच्या बाजूने आले नव्हते. लोकसभा निवडणुकीत आणखी एक धक्का बसल्यानंतर, भाजपला गांभीर्य लक्षात आले. परिणामी, पवन सिंह यांच्या घर वापसीचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे आणि संघटन मंत्री ऋतुराज सिन्हा यांनी पुढाकार घेत हा पक्ष प्रवेश घडवून आणला.
भाजपचा डाव यशस्वी होणार?
भाजपच्या या हालचालीचा शहाबाद आणि मगध भागातील जवळपास 20 ते 24 जागांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. आरा, बक्सर, रोहतास आणि कैमूर व्यतिरिक्त, मगधच्या जहानाबाद मतदारसंघातील सामाजिक समीकरण गुंतागुंतीचे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे एनडीएला पराभव पत्करावा लागला. पवन सिंह यांच्या पुनरागमनामुळे राजपूत आणि कुशवाह मतदारांमधील दरी कमी होऊ शकते आणि त्यांना एकत्र आणता येईल असे मानले जात आहे. पवन सिंह यांच्या लोकप्रियतेमुळे तरुण मतदारांना आपल्याकडे खेचता येईल, असा भाजप धुरिणांचा अंदाज आहे.
राज ठाकरेंना काय दिलं होतं चॅलेंज?
पवन सिंह याने मराठी-हिंदी वादावर भाष्य करताना मी जीव देईल पण मराठी बोलणार नसल्याचे भाष्य केले होते. मी मुंबईत काम करतो आणि करत राहिल. पण, मला मराठी येत नाही. देशभरात हिंदीतून संवाद साधण्याचा मला अधिकार असल्याचे सिंह यांनी म्हटले. महाराष्ट्रात राहता, तिथं काम करता आणि मराठी यायला हवी, हे काय आहे. अशी मागणी करणे म्हणजे अहंकार आणि माज दाखवण्यासारखं असल्याचे पवन सिंह याने एका कार्यक्रमात म्हटले होते.