मुंबई: देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित गैरव्यवहारावर बोट ठेवताना व्होट चोरीचा गंभीर आरोप केला. लोकसभा निवडणुकीतील गैरव्यवहाराबाबत राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आदित्य यांनी देखील सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे म्हटले आहे.
advertisement
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मतचोरीबाबत भाष्य करताना आपण देखील पत्रकार परिषद घेणार असल्याचे भाष्य केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन पत्रकार परिषद घेत मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश आणि ठाराविक मतदारांना कसे वगळण्यात येते, याचे सादरीकरणाबाबत आरोप केले होते.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत घोळ झाला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील भाष्य केले. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “आम्हीही मतदारसंख्येत अचानक झालेल्या वाढीबाबत, गायब मतदारांबाबत आणि मतदान केंद्रांवरील गैरव्यवस्थेबाबत आयोगाला मागील वर्षीच पत्र लिहिलं होतं. या सर्व घोळांवर लवकरच पत्रकार परिषद घेणार असून सगळं काही लोकांसमोर मांडणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरेंनी पुढे सांगितले की, निवडणुकीत अनेक त्रुटी दिसून आल्या असून त्यावर अजूनही अभ्यास सुरू आहे. निकाल आम्ही मान्य केला. पण सध्याचं सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही. एक उपमुख्यमंत्री आपल्या गावात रडत बसतात, तर कधी दिल्लीत जाऊन तक्रारी करत असतात,” असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपसोबत पुन्हा युती?
भाजपसोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळलं. “काही गोष्टींवर कधीच समझोता होऊ शकत नाही. राज्यात आणि मुंबई महापालिकेत ज्या प्रकारे लूट सुरू आहे, त्याच्याशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदींसोबत वाईट संबंध नाहीत अन् राहुल गांधींसोबत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत विचारलं असता, ठाकरेंनी “मोदींसोबत आमचे कधीही वाईट संबंध नव्हते आणि राहुल गांधींसोबतही चांगले संबंध राहिले आहेत. राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो,” असं स्पष्ट केलं.