राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार हे २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात होते. बारामतीत त्याच्या चार सभा होणार होत्या. यासाठी ते सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीसाठी निघाले होते. मात्र, लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. आता, या चौकशीतील प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
advertisement
या अहवालात अजित पवारांच्या विमान अपघाताची दोन प्रमुख कारणं देण्यात आली आहेत. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज या दोन प्रमुख कारणांमुळे हा अपघात झाला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.
नेमकं काय घडलं? तपासातील महत्त्वाचे मुद्दे
तांत्रिक बिघाड (Technical Snag):
प्राथमिक अहवालानुसार, विमानाने लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने कूच केली असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. विमानाची नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या समस्येमुळे विमान अस्थिर झालं होतं.
वैमानिकाचा चुकलेला अंदाज
अहवालात नमूद केल्यानुसार, बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा (Runway) अचूक अंदाज आला नाही. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा 'अँगल' चुकला, ज्यामुळे विमान धावपट्टीऐवजी बाजूला जाऊन आदळल्याचं म्हटलं जात आहे.
