राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी 'वर्षा' बंगल्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जवळपास सव्वा तास चर्चा केली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
advertisement
अजितदादांची खाती राष्ट्रवादीकडेच ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रफुल्ल पटेल म्हणाले, "अजितदादांकडे ज्या महत्त्वाच्या खात्यांचा जबाबदारी होती, ती खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मंत्र्यांना मिळावीत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये, यासाठी या रिक्त जागांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा वहिनींच्या नावाची चर्चा नाही, पण...
अजितदादांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार का? या प्रश्नावर पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, "आजच्या बैठकीत सुनेत्रा वहिनींच्या नावाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. शक्य झाल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही पवार कुटुंबाशी संवाद साधू," असे पटेल यांनी नमूद केले.
लोकभावने नुसारच निर्णय
प्रफुल्ल पटेल यांनी पुढे म्हटले की, "आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, पण तो घाईत घेतला जाणार नाही. पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन, सर्वांच्या आणि जनतेच्या भावना विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.
जबाबदारीचे मोठे आव्हान
अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही, याची कबुली देतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील रिक्त पदे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप हा प्राधान्याचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या चर्चेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
