परभणी : सोलापूरमध्ये निवडणुकीच्या वादातून मनसेच्या पदाधिकाऱ्याचा खून झाल्याची घटना ताजी असताना आता परभणीमध्ये हाणामारीची घटना समोर आली आहे. भाजप आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला केल्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थितीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील प्रभाग 4 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. परभणी मनपा निवडणुकीत प्रचाराच्या पहिल्या फेरीतच तणाव पाहण्यास मिळाला. मनपा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चाकूने मारायचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्याने केला आहे. वामन रमाकांत मोरे असं भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे.
advertisement
"प्रभाग क्रमांक ४ हा शांत आहे. मी उमेदवार होतो. काल मी शिवसेनेचा उपशहरप्रमुख होतो, कालच मी भाजपमध्ये प्रवेश केला. मला काल अक्षय देशमुख यांच्याकडून २५ लाखांची मागणी आली होती, आमचा प्रचार कर म्हणून. पण मी सांगितलं स्वाभिमान विकणार नाही. मी भाजपचे उमेदवार दिपक शिंदे यांना पाठिंबा दिला. त्याचा रोष धरून मावळ हॉटेलवर मी जेवून करून येत होतो. तिथून येत असताना आमची गाडी थांबवली. माझ्यासोबत राम शिंदेंचे भाऊसोबत होते. गाडी अडवून एवढा माज चढला का तुला, असं म्हणत मला दमदाटी केली. अचानक २५ ते ३० जणांचा घोळका आला आणि संतोष पेंडकर नावाच्या तरुणाने माझ्यावर चाकूने हल्ला केला, असा आारोप मोरे यांनी केला.
तसंच, ' जेव्हा आम्हाला अडवलं होतं, त्यावेळी विजय काळे नावाचा तरूण आला त्याने पिस्तुल काढली आणि अक्षय देशमुख यांच्या वडिलांनी त्याला मध्ये ठेवण्यास सांगितलं. मी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. हा अक्षय देशमुख हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे. पैशांच्या जिवावर दबाव टाकला जात आहे. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मोरे याने केली. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
