२८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन नक्की कुणी केले? त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या? यावर सीआयडीने प्रश्नांची सरबत्ती केली. आता अजितदादांचे पीए अविनाश सोलवट यांच्याकडून मिळालेली माहिती आणि विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' यातील माहितीची पडताळणी केली जाणार आहे. विमानाचा जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग आणि त्यानंतर झालेले ५ स्फोट यांमधील विसंगती शोधण्याचे आव्हान आता सीआयडीसमोर आहे.
advertisement
या प्रश्नांची उत्तरं सीआयडी शोधतेय...
प्रवासाच्या आदल्या रात्री (२७ जानेवारी) अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती? दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का? २८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याची आखणी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती? प्रवासाचा मार्ग आणि वेळ कुणी निश्चित केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का केली गेली ? त्यापूर्वी विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का? याचाही तपास होत आहे.
घातपाताच्या दिशेनं तपास
खरं तर, अजित पवारांच्या अपघातावर आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यासारख्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आता याच दिशेनं सीआयडी देखील तपास करत आहे. अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळावर झालेला अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही षड्यंत्र या दिशेने तपास सुरू आहे. यासाठी अजित दादांसोबतचे निकटवर्तीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची सुरुवातीला चौकशी केली जात आहे.
अजित दादांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांत होणार
पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान आणि पायलटमधील संभाषणाचे तांत्रिक विश्लेषण केलं जाणार आहे. यासाठी ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळवला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोटाचं नेमकं स्वरूप आणि आगीचे कारण शोधलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा बाह्य हस्तक्षेप (घातपात) यावर अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे.
