ब्लॅक बॉक्सवरून वादाची ठिणगी
रोहित पवार यांनी प्रामुख्याने विमानातील 'ब्लॅक बॉक्स' बाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर देखील बोट ठेवलं . सामान्यतः विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही, मात्र सध्या "ब्लॅक बॉक्स बंद होता" किंवा "तो जळून खराब झाला आहे," अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. यावर आक्षेप घेत रोहित पवार म्हणाले की, "अचानक सुरू झालेल्या या चर्चांमुळे घातपाताचा संशय बळावला आहे. ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी परदेशातील प्रयोगशाळेत पाठवल्याच्या बातम्या आताच का समोर येत आहेत?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
अपघाताला २० दिवस होऊनही नागरी विमान वाहतूक संचालनालयाचा (DGCA) प्राथमिक अहवाल अद्याप का आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तपासातील या विलंबामागे काही विशिष्ट हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला. केवळ व्हीएसआर (VSR) कंपनीला पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तर हा उशीर केला जात नाहीये ना? या कंपनीवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? समाजात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
"उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही"
रोहित पवार यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केलं की, दिवसभर सुरू असलेल्या चर्चांवरून या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत आहे. "आम्ही या घटनेचा छडा लावल्याशिवाय आणि हा अपघात होता की घातपात याचे सत्य समोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सरकार आणि तपास यंत्रणा यावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
