अशात कोल्हापूर आणि सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यात महापूराचा धोका घोंघावत आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यांसह आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इथल्या लोकांमध्ये भीती निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अलमट्टी धरण. कारण कर्नाटक सरकारच्या जल व्यवस्थापन नियोजनाचा भाग असलेल्या अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे.
advertisement
एकीकडे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने महाराष्ट्रातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. मात्र हे सगळं पाणी पुढे जाऊन अलमट्टी धरणात अडले जाण्याची भीती आहे. पुढे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग झाला नाही. तर कोल्हापूर सांगलीसह आसपासच्या परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशात आता कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोल्हापूर सांगलीकरांच्या मदतीसाठी धावलं आहे. त्यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुटकेचा निश्वास सोडला आहे. खरंतर, अलमट्टी धरणातील पाण्यावरून प्रत्येक वर्षी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संघर्ष बघायला मिळतो. कर्नाटकातील लोकांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून कर्नाटक सरकार अलमट्टी धरणात जास्तीत जास्त पाणी अडवण्याचा प्रयत्न करतं, पण या धरणात मर्यादेपेक्षा जास्त पाणी अडल्यास सांगली कोल्हापूरमध्ये पुराचा धोका निर्माण होते. आता कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने तूर्तास पश्चिम महाराष्ट्रात अलमट्टी धरणामुळे निर्माण होणारा संभाव्य पुराचा धोका टळला आहे. अलमट्टीसाठी महाराष्ट्राचे पाटबंधारे सचिव कर्नाटकसरकारच्या पाटबंधारे सचिवांसोबत संपर्क ठेऊन आहेत.