सोलापूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली, ज्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशातच आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आहे.
advertisement
निवडणुका घेता कशाला?
अमित ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, अशा निवडणुका होत असतील तर तुम्ही या निवडणुका घेताच कशाला? बाळासाहेब यांना न्याय मिळाला पाहिजे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे. त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे यावं.मी त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. असंही अमित ठाकरे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात आज आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे वचननामा प्रसिद्ध केला. मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत हा वचननामा सादर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जवळपास २० वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल झाले. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
‘शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द’ अशी टॅगलाईन असलेल्या या वचननाम्यात शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या युतीची दिशा आणि मुंबईच्या विकासाचा आराखडा मांडण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता, रोजगार आणि नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन वचननाम्याची प्राथमिक माहिती दिली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून अंतिम वचननामा जाहीर केला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. त्यानुसार आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत वचननाम्याचे अधिकृत प्रकाशन केले.
