अमरावती महानगरपालिकेच्या आगामी स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळत आहेत. सत्ता आणि संख्याबळ वाढवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे महापालिकेतील चित्र पूर्णपणे बदलले आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना-बसपा युतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे संख्याबळ वाढलं, वंचितचा पाठिंबा
निवडणुकीच्या तोंडावर 'वंचित बहुजन आघाडी'च्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसप्रणीत आघाडीचे संख्याबळ आता १५ वरून १६ झाले आहे. या वाढीव संख्याबळामुळे काँग्रेसला आता गणितानुसार २ स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी ही संख्या केवळ एका सदस्यापुरती मर्यादित होती.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे विलीनीकरण
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन सदस्यांनी 'शिवसेना-बसपा' आघाडीत विलीनीकरण केले आहे. या विलीनीकरणामुळे या संयुक्त गटाची सदस्यसंख्या आता ८ झाली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाच्या या सदस्यांना सोबत घेण्यासाठी राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, सदस्यसंख्या ८ झाली असली तरी तांत्रिक गुणांकनानुसार या गटाचा केवळ एकच सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होऊ शकणार आहे.
या राजकीय खेळींमुळे अमरावती महापालिकेत स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग आता अधिक रंजक झाला असून, कोणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
