सोलापूर: सोलापूरमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांनी अर्ज केला होता. पण, तो सुचकाची सही नसल्याचं कारण देऊन बाद केला. त्यामुळे भाजपचे नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पण, आता उज्वला थिटे यांनी अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला असून कोर्टात धाव घेणार आहे.
advertisement
अनगर नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमयी घडामोडीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. भाजपचे नेते राजन पाटील यांचं वर्चस्व असलेल्या अनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी आव्हान दिलं आणि नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. पण, दुसऱ्याच दिवशी हा अर्ज बाद झाल्यामुळे राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला. या मुद्यावर उमेदवार उज्वला थिटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
"अनगर नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी ४ ते ५ दिवस संघर्ष केला. आधीतर कागदपत्रच मिळत नव्हती. कशीबशी कागदपत्र मिळाली. मी माझ्या वकिलांकडून कागदपत्र तीन ते चारवेळा तपासून घेतली होती. सुचकाची सहीही सुद्धा होती. जेव्हा मी अर्ज भरला तेव्हा माझा मुलगा सोबत होता. त्याची सही सुद्धा होती. मग सुचकाची सही राहिलीच कशी, हे कसं होऊ शकतं' असा प्रश्न थिटे यांनी उपस्थितीत केला.
तसंच, 'माझा अर्ज कसा बाद झाला की केला आहे. याबद्दल मी कोर्टामध्ये दाद मागणार आहे. मी न्यायालयाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवते. मी कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. कोर्टात आम्हाला न्याय मिळेल' असं म्हणत थिटे यांनी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं जाहीर केलं.
काय आहे प्रकरण?
अनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत असणारे राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेसाठी घरातून सून प्राजक्ता पाटील यांनी उमेदवारी दिली. पण याला अजित पवार यांच्या गटाने उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमातून आव्हान दिलं होतं. मात्र थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात आलं. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला.
