बदलापूर : बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली. यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटलेत. दरम्यान त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांसोबत EXCLUSIVE संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. यावेळी मुख्याध्यापिकांनी घडलेली घटना आणि त्यावर केलेली कारवाई याबाबतचा तपशील दिलाय.
मुख्याध्यापिकांसोबतचा संवाद जसाच्या तसा
'जो प्रकार घडला त्याबाबत 14 तारखेला वरिष्ठांना कळवलं. एका पालकांनी माझ्याशी 13 तारखेला संपर्क केला. मी हलकं सोडलं नाही. मी त्या मुलीला ऑफिसमध्ये बोलावलं. मी 10.30 वाजता शाळेत गेल्यावर शिक्षकांनी मला जे झालं त्याबद्दल सांगितलं. त्यानंतर मी मुलीला बोलावलं आणि कुठला दादा आहे ते दाखव सांगितलं. चार वर्षांची मुलगी काय सांगणार? आम्ही सगळं फिरवून तिला विचारलं, इथून येतो का? तिथून येतो का? नंतर तिच्या पालकांना बोलावून घेतलं. त्यांनी मुलीला दवाखान्यात नेतोय, कोणीतरी दादा हात लावतो, असं ती सांगत होती, असं तिच्या पालकांनी आम्हाला सांगितलं.
advertisement
14 तारखेला मी मॅनेजमेंटच्या कानावर घातलं. दुसरे पालक माझ्यापर्यंत आलेच नाहीत. 16 तारखेला डायरेक्ट आले पोलीस, मीडिया घेऊन. ज्या मुलीला दुखापत झालीये तिचे पालक माझ्यापर्यंत किंवा मॅनेजमेंटपर्यंत पोहोचलेच नाहीत. ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले.
पहिल्या घटनेबाबत अध्यक्ष आणि सचिव यांना सांगितलं. त्यांना मी फोनवर सांगितलं कारण मी 14 तारखेला तब्येत बरी नसल्यामुळे रजेवर होते. 13 तारखेला ते पालक शाळेत आले आणि मुलीला दवाखान्यात नेतोय असं सांगून गेले. त्यानंतर 14 ला ते शाळेत आले, पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी आले नव्हते. माझ्याकडे डॉक्टरांची फाईल आहे. 14 तारखेला मी अध्यक्ष आणि सचिवांना फोन करून जे घडलं ते सांगितलं आणि पालक शाळेत आल्याचंही सांगितलं. मी कुठेही मला कळल्यावर लपवून ठेवलं दुर्लक्ष केलं, असं नाही.
हो का? अरे बापरे, अशी प्रतिक्रिया सचिव आणि अध्यक्षांनी दिली. मी पालकांना बोलावलं आहे वगैरे सगळं त्यांना सांगितलं. 16 ला ते आले मग पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. दुसऱ्यांचं आहे हे आम्हाला कळालं.
प्रश्न : 13 तारखेला पहिली घटना घडली तेव्हा पोलिसांना कळवा, असं मॅनेजमेंटने तुम्हाला सांगितलं का?
उत्तर : नाही, हात लावला एवढच होतं ना. ती मुलगी 14 तारखेला शाळेत होती. 13 तारखेला ती मुलगी पूर्ण दिवस शाळेत बसली. झालंय ते निंदनिय आहे, मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय.
दुपारी मनसे कार्यकर्ते, पोलीस आणि मीडियावाले आले, तेव्हा मी कोतवाल सरांना आणि आपटे सरांना बोलावून घेतलं. पोलीस होते, त्यांच्यासोबत शितोळे मॅडम होत्या. ते आधी आमच्यापर्यंत आलेच नाहीत, ते आधी पोलीस स्टेशनला गेले. आजोबा आणि त्यांचा मुलगा नंतर आले आणि असं झालंय ते सांगितलं.
पहिल्या मुलीसोबत ही घटना घडली तेव्हा मी तिला दादा कोण, कुठे असतो हे विचारलं. पण तिने काहीच दाखवलं नाही. ते 4 वर्षांचं मुल काय दाखवणार? तो आमच्याकडे सफाई कामगार म्हणून 8-10 दिवसच येत होता. अक्षय शिंदेला संस्थेने कामावर ठेवलं होतं. कॉन्ट्रॅक्ट असतं हा बदली म्हणून आला होता. त्याच्या वागणुकीतून काही जाणवलं नाही. तो जॉईन झाला तेव्हा त्याला माझा फोन नंबर दिला होता, त्याचा फोननंबर घेतला होता. त्याची माहिती घेतली होती. आधी जो होता तो माझा धाकटा भाऊ आहे, मी मोठा भाऊ आहे. लग्न झालं आहे बायको प्रेग्नंट आहे, अशी माहिती त्याने मला दिली. संस्था सगळं बघतेय म्हणून मी त्याचा फोन नंबर घेऊन ठेवला होता.
15 मिनिटं येऊन तो संडास-बाथरूम झाडून जायचा, सकाळी आणि दुपारी. आमच्या सेविका उभ्याच असायच्या. मॅनेजमेंटने सगळ्यांचे फोटो दाखवले, त्यात मुलींनी ओळखलं आहे, की हा दादा आहे.
मला त्या मुलींबद्दल खूप वाईट वाटतंय. असं नाही व्हायला पाहिजे होतं. 30 वर्ष माझी सर्व्हिस झाली असं कधीच घडलं नव्हतं.
असं शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या आहेत.
