संगमनेर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेसचे पक्ष चिन्ह 'पंजा'ऐवजी 'सिंह' या निशाणीवर बाळासाहेब थोरात यांची संगमनेर सेवा समिती रिंगणात आहे.
भाच्याच्या पत्नीसाठी थोरातांचा प्रचार
काँग्रेसमधून निलंबित असलेले नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे निवडणूक रिंगणात आहे. आज संगमनेर शहरात संगमनेर सेवा समितीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मागील 40 वर्षाच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली.
advertisement
थोरातांनी वाचला विकासकामांचा पाढा
संगमनेर तालुका म्हणून चर्चा करायला हवी. तालुक्यातील सहकारामुळे शहरात विकास झाला. आपण काम करताना विरोधकांना देखील शिक्षण संस्थांची परवानगी मिळवून दिली. शहरात आपण रस्त्यांची कामे केली. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला. शिर्डी विमानतळही माझ्यामुळे जवळ आले. पुणे नाशिक रेल्वेसाठी मी प्रयत्न केले, अशी उदाहरणे देऊन थोरात यांनी विकास कामांचा पाढा वाचला.
थोरात भाषण करीत असताना कचऱ्याची घंटा गाडी कार्यालय परिसरात पोहचली. तोच धागा पकडत थोरात म्हणाले, हा कार्यक्रम दुर्गा ताईंनी सुरू केला. आता यात गोंधळ सुरू झाला आहे. जीव लावून काम केल्यामुळे प्रशासक असताना देखील कचरा नियोजन काम व्यवस्थित सुरू होते.
सत्ता असतानाही रस्ता का होत नाही? थोरातांची विखेंवर टीका
आपण अनेक रस्ते केले मात्र अजूनही नगर मनमाड रस्ता दुरुस्त होत नाही. ज्याला अंग मोकळे करून घ्यायचे आहे त्यांनी तिकडून एकदाच जा. बघा काय हाल होतायेत आणि सत्ता असतानाही मनमाड रस्ता का होत नाही, हे विचारा, असे म्हणत त्यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली.
आपण गेल्या ३०-४० वर्षांत केलेला विकास डोळ्यासमोर ठेवा
प्रचाराला येणाऱ्यांना विचारा रेल्वेचे काय झालं ? आपण गेल्या ३०-४० वर्षांत केलेला विकास डोळ्यासमोर ठेवा. तसेच गेल्या वर्षभरात शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय झालीये, हे डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असे थोरात म्हणाले.
