याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन पुलामुळे परळ आणि प्रभादेवी परिसर एकमेकांशी सव्वाशे वर्षांहून जास्त काळापासून जोडले गेले होते. लोअर परळ परिसरात सरकारी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर, प्रभादेवी परिसरात हॉटेल्स, मॉल्स आणि बाजारपेठा आहेत. परळ स्थानकावर उतरून प्रभादेवी पुलाचा वापर करून दोन्ही दिशेला जाणे नागरिकांसाठी सोपं होतं. आता मात्र त्यांची मोठी गैरसोय होत आहे. पुलावरून धावणाऱ्या 162 क्रमांकाच्या बेस्ट बसचा मार्ग देखील बदलल्याने प्रवाशांकडून जास्तीचे तिकीट घेतलं जात आहे. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
शिवडी रेल्वे स्टेशन ते वरळी गावादरम्यान बेस्टची 162 क्रमांकाची सेवा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बसफेरीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. या मार्गावर शिवडी ते वरळी गाव अशा प्रवासाचे 10 रुपये तिकीट होतं. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने आता तिकीटासाठी 20 रुपये आकारले जात आहेत. पूल बंद झाल्यामुळे बेस्ट बसला भारतमाता, करी रोडमार्गे वरळी गाव असा चार किमीचा वळसा घालावा लागत आहे. परळ परिसरातील रुग्णालयांत येणारे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, शाळकरी मुलांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणीचं काम केव्हा पूर्ण होईल, याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे नियमित प्रवाशांनी किती काळ आर्थिक भुर्दंड सोसायचा? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. बेस्टने याचा विचार करून आधीच्या दरानुसार 10 रुपयांचे तिकीट आकारावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.