काय आहे नेमकं प्रकरण?
प्रभाग ५ मधील भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते राजकुमार आलूरे यांचं तिकीट पक्षाने कापल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आलुरे यांनी आपल्या समर्थकांची एक महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीला भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान आवळे यांनी देखील उपस्थिती लावली. "मला तिकीट मिळालं, कमळ चिन्ह मिळालं असलं, तरी माझ्या निष्ठावंत सहकाऱ्यांना डावललं गेलंय. अशा तिकीट आणि पदाला लाथ मारून मी तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलोय," असे खळबळजनक विधान आवळे यांनी यावेळी केले.
advertisement
२५ लाखांची ऑफर धुडकावली होती!
समाधान आवळे यांनी यावेळी २०१७ च्या निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला. "मी २०१७ मध्ये 'हत्ती' चिन्हावर निवडून आलो होतो. त्यावेळी भाजपचा महापौर निवडताना एका मताची गरज होती. मला मतदानासाठी २५ लाख रुपयांची ऑफर दिली होती, पण मी ती धुडकावली. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मला हवे ते मागण्यास सांगितले, तेव्हा मी फक्त पुढील निवडणुकीत तिकिटं द्यावं, असा शब्द मागितला होता. आमदारांनी तो शब्द पाळला. मला तिकीट मिळालं. पण माझ्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असेल, तर मी शांत बसणार नाही," असे आवळे यांनी ठणकावून सांगितले.
'कार्यकर्त्यांच्या डोळ्यात माती फेकून नगरसेवक व्हायचे नाही'
आवळे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. "गेल्या पाच वर्षात मी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मात्र, माझ्यासोबत रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात माती टाकून जर मी पुन्हा नगरसेवक होत असेल, तर त्या पदाला काहीच महत्त्व उरणार नाही," असे म्हणत त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला घरचा आहेर दिला. भाजपच्या अधिकृत उमेदवारानेच बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याने प्रभाग ५ मधील निवडणूक रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.
