राज्याच्या राजकारणात येणार का असं विचारलं असता विनोद तावडे यांनी म्हटलं की, मला राज्याच्या राजकारणात रस नाही. केंद्रात संघटनेसाठी मी काम करत आहे त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रात फारसा रस नाही. माझ्यासाठी फक्त राष्ट्राला प्राधान्य आहे. माझं तिकीट २०१८ मध्ये कापण्यात आलं होतं पण मी आज संघटनेत काम करतोय. मला पक्षाने विधानसभा लढण्यास सांगितलं होतं पण मी नकार दिला.
advertisement
मतांच्या ध्रुवीकरणाचे आरोप प्रत्यारोप आता प्रचारात होत आहेत. त्याबद्दल विचारलं असता विनोद तावडे यांनी म्हटलं की, काही लोक असं करत आहेत. लोकसभेत उद्धव ठाकरे यांना हिंदूंपेक्षा मुस्लिम मतं जास्त मिळाली. धुळ्यात हे घडलं असल्याचंही तावडे यांनी सांगितलं. नवाब मलिक मलिक यांच्याबद्दल विनोद तावडे म्हणाले की, आम्ही आजही नवाब मलिक यांचा प्रचार करत नाही. सहकारी पक्षावरही दबाव टाकू शकत नाही. आम्हालाही काही मर्यादा आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर विनोत तावडे म्हणाले की, भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा होते त्यांना बनवलं जात नाही. मला पक्षाचं काम करण्यात जास्त रस आहे. निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवलं जाईल.
लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झालंय आणि त्यात दुमत असण्याचं कारण नाही. अजित पवार हे त्यांच्या पक्षाची विचारधारा घेऊन चालतात. त्यामुळे त्यांना हे चुकीचं वाटू शकतं आणि म्हणून ते हे चुकीचं आहे असं म्हणत असल्याचंही विनोद तावडे म्हणाले.
मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरबद्दल विनोद तावडे यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाचा प्रश्न १९६५ पासून सुरू आहे. मीसुद्धा यावर काम केलंय. २०१४ मध्ये काँग्रेसच्या काळात अंमलबजावणी झाली नाही. आता लोकसभेसारखा विधानसभेला परिणाम दिसणार नाही. आरक्षण भाजपने दिलं.
माहिममध्ये मनसेने राज ठाकरेंचे पुत्र अमित यांना उमेदवारी दिलीय. त्यांना पाठिंबा देण्याची भाजपची भूमिका आहे. पण महायुतीकडून सदा सरवणकर हे मैदानात आहेत. त्यामुळे महायुतीत पेच निर्माण झालाय. यावर विचारले असता विनोद तावडे म्हणाले की, राज ठाकरेंनी लोकसभेला आम्हाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे पक्षाला वाटतं की माहिमच्या जागेवर आपण पाठिंबा द्यावा. पण सदा सरवणकर हे त्यांच्या भूमिकेवर कायम आहेत. अशा स्थितीत आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पुढच्या दोन दिवसात भूमिका ठरवतील.
