लातूर :लातूर जिल्ह्यातील औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून भीषण धडक दिली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथील तीन जणांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा औसा शहराजवळील ओव्हरब्रिज परिसरात हा अपघात घडला. ररस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला (क्र. एमएच 25 एयू 3163) बीएमडब्ल्यू कारने (क्र. एमएच 13 सीके 0001) पाठीमागून जोराची धडक दिली. कारचा वेग इतका प्रचंड होता की, धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
मृतांची नावे समोर
या भीषण अपघातात आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (36), शुभम शेषराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंखे (48, तिघेही रा. बोरगाव नकुलेश्वर, ता. औसा) आणि धनराज काशिनाथ जाधव (46, रा. सांगली) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर जयहिंद विश्वास जाधव (रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हलदर (रा. सांगली) हे दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
या अपघातानंतर औसा ओव्हरब्रिज परिसरातील 'ब्लॅक स्पॉट'चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शनिवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्यावर, तांबे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाला कडक सूचना
अपघात टाळण्यासाठी महामार्गावर योग्य दिशादर्शक फलक लावणे, वेग मर्यादेच्या सूचना देणारे बोर्ड लावणे, प्रकाश व्यवस्था सुधारणे आणि वाहतूक नियंत्रण अधिक कडक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
