नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ भैरोबा नाल्यावरील पुलावर काल सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली. या अपघातात वाहनाचं पूर्णपणे नुकसान झालं होतं आणि चालक आतमध्ये अडकून पडला होता.
त्याच वेळी लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव हे पुलावरून जात होते. रस्त्यावर झालेली गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली. विचारपूस केल्यावर खाली नाल्यात कार पडल्याचे त्यांना समजले. गाडीमध्ये काही हालचाल होत असल्याचे लक्षात येताच, आत कुणीतरी अडकले असावं या खात्रीने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते नाल्यात उतरले.
advertisement
कारमध्ये चालक बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याच्या नाकातून प्रचंड रक्तस्राव होत होता. यादव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीची काच फोडली आणि जखमी चालकाला बाहेर काढले. लष्करातील आपल्या प्रशिक्षणाचा वापर करत यादव यांनी तातडीने स्वतःच्या रुमालाने चालकाच्या नाकावर दाब देऊन रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच गंभीर जखमी चालकाला नाल्याबाहेर काढून उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली.
विशेष म्हणजे, त्या अपघातग्रस्त कारमध्ये १ ते १.५ लाख रुपयांची रोकड होती. चालक शुद्धीवर आल्यानंतर यादव यांनी ती संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे त्याच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर एका टेम्पोच्या मदतीने जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्याने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
