पनवेल : पनवेलमधून एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चारचाकी कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण पुलाच्या २५ ते ३० फूट खाली फेकले गेले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील तारा गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर विचित्र अपघात झाला. आशिष सिंग परदेशी ( उलवे) हे त्यांच्या मित्रांसह कर्नाळा पक्षी अभयारण्य बघण्यासाठी गेले होते. पक्षी अभयारण्य पाहून झाल्यानंतर ते जेवणासाठी हॉटेल शोधत मोटरसायकलने जात होते. पनवेल ते गोवाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तारा गावाजवळील ब्रिज इथं आले असता पनवेलच्या दिशेनं वेगाने जात असलेल्या हुंदई क्रेटा एसयुव्ही क्रमांक एम एच ०६ BU ८११८ वरील चालकाने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच ४३ बीटी ८१७७ ला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवत असलेले सलमान शहा (२७)त्यांच्यासोबत असलेली अदिती सिंग (२८) आणि गौरी खैरनार (१०) हे दुचाकीवरून उडाले आणि पुलाच्या खाली अंदाजे २५ ते ३० फूट उंचीवरून खाली कोसळले. या अपघातात एका जणांचा मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आदिती सिंग हिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारचालक हर्षद प्रकाश जैन (वय ३२, राहणार रेवदंडा, अलिबाग) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके अधिक तपास करत आहेत.