जळगाव जिल्ह्यातील बोधरे येथील गोरख विठ्ठल गायकवाड (वय 30) हे ऊसतोड कामगार आहेत. याच कामानिमित्त पत्नी ज्योती आणि लेकरांसह ते पुण्यात गेले होते. हंगाम आटोपल्यावर सोमवारी सायंकाळी कुटुंब गावी परतू लागले. प्रवासादरम्यान ट्रॅक्टरच्या धक्क्यांमुळे ज्योती यांना पोटदुखी सुरू झाली. वेदना वाढत गेल्या आणि परिस्थिती गंभीर बनली.
रस्ता चुकला अन् घात झाला, कालव्यात उलटली कार, छ. संभाजीनगरमध्ये 'त्या' तिघांसोबत भयंकर घडलं
advertisement
पुणे–जळगाव मार्गावरील (एमएच-14 एमएच-6462) जामनेर आगाराची बस त्यांनी पहाटे पकडली. सकाळी सुमारे 8.50 च्या सुमारास बस वाळूजजवळ पोहोचताच ज्योती यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चालक एस. एम. माळी आणि वाहक ए. एस. अंभोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता बस थांबवली. जवळपास 25 प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवून त्यांच्या पुढील प्रवासाची सोय दुसऱ्या बसने करण्यात आली.
रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने चालकाने बस थेट वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवली. मातेची प्रकृती चिंताजनक होत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते आणि परिचारिका उषा गायकवाड यांनी बसमध्येच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आशा सेविका वैशाली चापे, तसेच ऊर्मिला जाधव, दीपाली गायकवाड, पुष्पलता जाधव आणि आरोग्य सेवक सुनील म्हस्के यांच्या मदतीने सुरक्षित प्रसूती पार पडली. ज्योती गायकवाड यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.
“वेदना प्रचंड वाढत होत्या, वेळ दवडणं धोक्याचं होतं. कागदपत्रांची पूर्तता नसली तरी वैद्यकीय कर्तव्य आणि मानवी दृष्टिकोन यांनाच आम्ही प्राधान्य दिलं,” असे डॉ. प्रशांत दाते यांनी सांगितले. या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. गावाकडच्या भाषेत सांगायचं तर, “देव माणसांच्या रूपानं भेटला,” अशी भावना गायकवाड कुटुंबीयांनी व्यक्त केली.






