मनस्वी ही हिरापूर येथे कुटुंबासह राहत होती. तिचे वडील विजय गाडगे हे खासगी हॉटेलमध्ये व्यवस्थापक असून ते आजारी असल्याने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील रुग्णालयात उपचार घेत होते. मंगळवारी मनस्वी आई आणि धाकट्या बहिणीसह दुचाकीवरून बाहेर पडली होती. बहिणीला शाळेत सोडणे आणि वडिलांना रुग्णालयात डबा घेऊन जात होती. मात्र, वाटेत आईला अचानक चक्कर आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली.
advertisement
अंत्यविधीला हजेरी अन् काही वेळातच श्रद्धांजली! डॉक्टरसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं
याचवेळी महापारेषणच्या कामासाठी मुरूम टाकणारा हायवा चालक मागे घेत असताना मागील परिस्थितीचा अंदाज न घेता वाहन थेट मनस्वीच्या अंगावर घालण्यात आले. या अपघातात तिची आई बाजूला फेकली गेली, तर मनस्वीचा कंबरेखालचा भाग गंभीररित्या चिरडला गेला. विशेष म्हणजे हे काम शासकीय असताना विनाक्रमांकाचा हायवा वापरला जात असल्याचेही समोर आले.
उपचारांना उशीर
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत मनस्वीला हिरापूरपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावरील चिश्तिया चौकातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारांना विलंब होत असल्याने तिला पुढे सुमारे 6.4 किलोमीटर दूर असलेल्या घाटी रुग्णालयात हलवावे लागले. अशा प्रकारे एकूण जवळपास 18 किलोमीटरचा प्रवास जखमी अवस्थेत करावा लागल्याने उपचार सुरू होण्यास उशीर झाला आणि तिची प्रकृती अधिकच खालावली. अखेर बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं
मनस्वी ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती आणि ती मेडिकल सीईटीची तयारी करत होती. घरातील मोठी मुलगी म्हणून तिने अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. वडिलांच्या आजारपणातही घर आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी ती समर्थपणे सांभाळत होती. तिच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि स्थानिक महिलांना अश्रू अनावर झाले. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
जालना रोड ते हिरापूरदरम्यान योग्य रस्ता नाही आहे. परिसरात सुरू असलेल्या खासगी बांधकामांमुळे दिवसभर सिमेंट मिक्सर आणि विनाक्रमांकाचे हायवा वेगाने धावत असल्याचे दिसून आले. अरुंद रस्ता, मोठ्या प्रमाणातील धूळ आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मंगळवारी झालेल्या अपघातानंतरही बुधवारीही हीच परिस्थिती कायम असल्याचे आढळले.
कंत्राटदारावर गुन्हा
या प्रकरणात संतप्त नातेवाईकांच्या मागणीनंतर चिकलठाणा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संबंधित हायवा चालक, महापारेषण तसेच कंत्राटदार यांच्याविरोधात मनस्वीच्या मृत्यूस जबाबदार ठरवत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अंमलदार सुधाकर बोचरे यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील सुरसे करत आहेत. हिरापूर परिसरात सतत सुरू असलेल्या हायवा आणि सिमेंट मिक्सरच्या वाहतुकीमुळे लहान वाहनचालकांना ‘साईड’ न दिल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या आहेत.






