नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णूनगर परिसरातील एका गॅरेजवर सिराज आणि वैभव हे दोन तरुण बसलेले होते. दुचाकीची दुरुस्ती सुरू असताना अचानक काही अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी काहीही न बोलता या दोन्ही तरुणांच्या अंगावर थेट ॲसिड फेकले. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की, तरुणांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही.
advertisement
तरुण गंभीर जखमी, परिसरात दहशत
ॲसिड पडल्यामुळे सिराज आणि वैभव यांच्या शरीराचा काही भाग भाजला असून त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर परिसरात आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी तरुणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या कृत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून हा हल्ला झाला की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून आरोपी कोणत्या दिशेला पळाले याचा माग काढला जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र अशाप्रकारे दोन तरुणांनी काहीही न बोलता अॅसिड हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
