मेळघाटातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय आणि शासनाच्या उदासीनतेविरोधात माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील पदयात्रेचा चिखलदऱ्यात समारोप झाला.
समारोपावेळी चिखलदऱ्यात त्यांची भेट घेण्याकरिता उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आले होते. यावेळी फोनवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीचे संपूर्ण श्रेय बच्चू कडू यांनी दिले.
...त्याचे श्रेय बच्चू कडू यांना जाते!
advertisement
एकनाथ शिंदे म्हणाले, "बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात नागपुरात आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून कर्जमाफीसाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचे श्रेय बच्चू कडू यांना जाते. त्यांच्यामुळेच हा निर्णय जलद गतीने झाला"
कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचे विराट आंदोलन
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, शेतमजूर, मच्छिमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. बच्चू कडू यांनी नियमित कर्जदार आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या साथीला त्यांचे शेकडो कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. नागपुरात जवळपास पाच दिवस आंदोलन केल्यानंतर शासनाने दखल घेऊन कर्जमाफीसाठी समिती नेमली. त्याच समितीच्या अभ्यासाच्या अनुषंगाने सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली. बच्चू कडू यांच्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली होती. याच आंदोलनाची आठवण एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर काढली.
