६० वर्षीय दत्ताराम सीताराम नागप महाराज हे वैभववाडी तालुक्यातील आखवणे पुनर्वसन गावठण येथील रहिवासी होते. शुक्रवारी पहाटे पंढरपूरात त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. "पांडुरंगाच्या नामस्मरणात रमलेल्या या वारकऱ्याने वारीतच शेवटचा श्वास घेतला. या घटनेने वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
नागप हे आपल्या परिवारासह २९ ऑक्टोबर रोजी कार्तिकी वारीसाठी पंढरपुरला गेले होते. गुरुवारी रात्री त्यांनी कीर्तन सादर करून भगवान विठ्ठलाच्या चरणी वारी केली. त्यानंतर आपल्या निवासस्थानी परतल्यावर पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ताराम नागप हे केवळ कीर्तनकार नव्हते, तर समाजकार्य, श्रद्धा आणि शांततेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या वडिलांपासूनच कीर्तन परंपरेचा वारसा त्यांनी जपला होता.
advertisement
मुंबईतील बेस्ट खात्यात ते अधिकारी होते. दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर ते पूर्णपणे समाजकार्यात गुंतले. ते अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अरुणा धरणग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळालं. तर आखवणे भोम व नागपवाडी पुनर्वसन गावठणाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शांत, संयमी, अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र होती.
