मिळालेल्या माहितीनुसार, धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलक दिपक बोऱ्हाडे मुंबईतील आझाद मैदानात मागील १० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे. एकीकडे राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पण, अजूनही दिपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईत दिपक बोऱ्हाडे यांची भेट घेणार आहे. पण, त्याआधीच जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
दिपक बोऱ्हाडे यांचे सासरे रामराव पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दिपक बोऱ्हाडे मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली आहे.
जावई दिपक बोऱ्हाडे यांची खालावत चाललेली तब्येत बघवत नसल्याचं सांगत सासरे रामराव पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलंय, असल्याचं सांगितलं जात आहे. जालन्याती छत्रपती काॅलनीतल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामराव पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.
मनोज जरांगे दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला भेट देणार
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता जरांगे अंतरवाली सराटीहुन मुंबईकडे रवाना होणार आहे. या दौऱ्यात जरांगे आझाद मैदानावर सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला भेट देणार असून या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत. मुंबईत पोहचल्यानंतर जरांगे आझाद मैदानावर जाऊन धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, त्याआधीच दिपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्याने आत्महत्या केल्यामुळे मनोज जरांगे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
