आगामी २०२५ च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २८ मे रोजी बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विभागांना आवश्यक सूचना आणि निर्देश दिले होते. त्यास अनुसरुन सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने वारकरी, मानाच्या पालख्या तसेच भाविकांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
advertisement
आषाढी वारीदरम्यान १८ जून ते १० जुलै दरम्यान टोलमाफी मिळणार आहे. १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. तसा शासन आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.
पास कुठे मिळणार?
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना "आषाढी एकादशी २०२५, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधीत आर.टी.ओ. यांचेशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन द्यावेत. पंढरपूरला जातेवेळी आणि परत पंढरपूरहुन येतेवेळी दिनांक १८.०६.२०२५ ते १०.०७.२०२५ या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच असेल, अशा सूचना दिल्या आहेत. तसे स्टीकर्स / पास वर नमूद करण्यात यावे. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
सर्व पथकर नाक्यांवर रवतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागाला देखील जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून HSP (Highway Security Patrolling) मार्फत पथकर नाक्यांजवळ पोलिसांची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC), डेल्टा / MSSC (Maharashtra State Security Council) फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत.
