हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सात वाजता अपहरण करुन मारहाण झाली होती. धाराशिव शहर पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नव्हता. पोलीस अधीक्षक रितु खोकर यांना हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके भेटल्यानंतर आज धाराशिव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात अपहरणकर्त्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. नागेश मडके हा बंदुकीसाठी बनाव करतोय, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते. शेवटी मडके यांनी रविवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
दरम्यान १० जुलै रोजी नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेरा दिवसांनंतर नागेश मडके यांचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. धमकी दिल्यावरच पोलिसांनी कारवाई करणे गरजेचं होते, असे सांगत मी आता श्रावण महिना असल्याने बोकड न कापण्याचा निर्णय घेतला असल्याचे मडके यांनी सांगितले. नॉनव्हेज जेवण न देता शुद्ध शाकाहारी जेवण विकणार असल्याचा निर्णय भाग्यश्रीच्या मालकांनी घेतला आहे.
मी अशिक्षित माणूस आहे, मला बंदुकीची काय गरज आहे, मला तर लिहिता वाचता येत नाही. मला मारहाण झाली. माझी सोन्याची ४० हजाराची चेन त्यांनी काढून घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. चांगला तपास करतील अशी मला खात्री आहे, असे हॉटेल मालक नागेश मडके यांनी म्हटले.
