मिळालेल्या माहितीनुसार, उमरग्याच्या निळू नगर तांड्यावरील तीन मुलींनी कोरियन डान्स ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचला होता. मात्र अवघ्या 30 मिनिटांत पोलिसांनी तो कट उधळून लावला असून तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं आहे. उमरग्यातून पुण्याला जायचं, तिथे जाऊन पैसे कमवायचे आणि कोरियाला जायचं, असा कट मुलींनी रचला होता. त्या धाराशिवमधून थेट पुण्याच्या दिशेने निघाल्या देखील होत्या.
advertisement
मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेमुळे अवघ्या 30 मिनिटात 3 अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. मुलींनी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथून स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली. त्यानंतर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी मुलींना गाठलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून मुलींना ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधीन केलं.
कोरियाला जाण्यासाठी मुलींनी स्वत:च्या घरातूनच 5 हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती देखील पोलीस तपासांत समोर आलीय. उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथून शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबसमधून काही लोकांनी अपहरण करून घेवून गेले. गळ्यावर चाकू ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली, असा कॉल पोलिसांना आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. मात्र एवढ्या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील सिंगर आणि डांसर ग्रुपच्या प्रेमात कशा पडल्या, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.