लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातील पाणी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याला सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीत फोन लावण्यात आला, त्याला लागलीच मंजुरी ही देण्यात आली. आज धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पाणी मागणीची बैठक झाली. त्यात जलसंधारण विभागाने पाणी देणे शक्य नसल्याचे सांगितले. तरी देखील विशेष बाब म्हणून हे पाणी मंजूर करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून धरणात केवळ आठ टक्के पाणीसाठा उपयुक्त आहे. असे असताना देखील अभिमन्यू पवार यांनी आपले राजकीय वजन वापरत धाराशिव जिल्ह्याचे पाणी लातूरला पळवले असल्याचे चर्चा धाराशिव जिल्ह्यात रंगताना पाहायला मिळत आहे.
advertisement
वाचा - मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन; मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट
मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या जेमतेम 85 टक्के पाऊस पडला. त्यातही नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यावर अधिक आभाळमाया राहिल्याने अन्य सहा जिल्ह्यांवर जलसंकट घोंगावते आहे. या जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात आजघडीला केवळ 31 टक्केच जलसाठा उरला आहे. या प्रकल्पात केवळ 26 टक्के जलसाठा आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात 22 टक्के, बीड जिल्ह्यातील 16 मध्यम धरणात 42 टक्के, लातूरमधील 8 प्रकल्पात 28 टक्के. धाराशिवमधील 17 प्रकल्पात 16 टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील 9 प्रकल्पांत 61 टक्के आणि परभणी जिल्ह्यातील 2 प्रकल्पात 25 टक्के जलसाठा आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील 750 लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे.