मिळालेल्या माहितीनुसार, गोजर माळी असं हत्या झालेल्या २८ वर्षीय पत्नीचं नाव आहे. तर धनंजय भारत माळी (वय-३५) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी धनंजय आपली पत्नी आणि तीन मुलींसह तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे वास्तव्याला होता. तिन्ही मुलीच असल्याने धनंजय पत्नीला त्रास देत होता. तुला फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही, असं म्हणत आरोपी धनंजय पत्नीला जाच करायचा.
advertisement
घटनेच्या दिवशी गुरुवारी (१९ डिसेंबर) तिन्ही मुली शाळेत गेल्यानंतर दोघांमध्ये याच कारणातून वाद झाला. यानंतर संतापलेल्या आरोपीनं पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाडून तिचा जीव घेतला आहे. आरोपीनं पीडितेचं डोकं भींतीवर आदळलं होतं. त्यानंतर त्याने कोयत्याने पत्नीच्या गळ्यावर अनेक वार केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने घराबाहेर पडत मी पत्नीचा खून केला, असं लोकांना सांगत सुटला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.