धाराशिव - संघर्ष करत जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर व्यक्ती संकटावर मात करत यश मिळवू शकतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. दीपक आवळे असे या तरुणाचे नाव आहे. दीपक हे धाराशिव शहरातील रहिवासी आहेत. आज आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. जाणून घेऊयात त्यांची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
धाराशिव शहरातील दीपक आवळे यांना घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. दहावीनंतर आई वडिलांचे छत्र त्यांच्या डोक्यावरुन हरपले. त्यामुळे दुःखातुन सावरत त्यांनी कसेबसे 11 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण पुढे बारावीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने 12 वीचे शिक्षण पुर्ण करता आले नाही.
या परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर एकतर नोकरी किंवा व्यवसाय गरजेचा होता. मात्र, दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या नव्हत्या. यामुळे त्यांचा जगण्यातला संघर्ष सुरू झाला. 2008 मध्ये त्यांनी केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 2014 ला इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात प्रवेश केला.
घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये भांडवल नव्हते, म्हणून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी चहा विकला. हाती पडेल ते काम केले. परंतु केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय चालूच ठेवला. अशातच भाग्य चमकले आणि त्यांना एसटी महामंडळात नोकरी मिळाली. त्यानंतर व्यवसायात त्यांनी हळूहळू 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
मुबंईतील नोकरी परवडेना, आज गावी दिवसाला कमावतोय 7 ते 8 हजार रुपये नफा, तरुणानं करुन दाखवलं!, VIDEO
आता त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यात त्यांनी चांगला जम बसवला आहे. यामध्ये त्यांना त्यांची पत्नी भाग्यश्री यांचीही मदत होत आहे. दीपक हे नोकरी करतात. तर त्यांचा पूर्ण व्यवसाय भाग्यश्री सांभाळतात. या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे एका स्री शक्तीची ताकद उभी असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच यातून परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जगण्यातला संघर्ष हा एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जातोच, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.