दोन्ही कुटुंबात मानापमानावरून ठिणगी
या भीषण घटनेत साक्री येथील रहिवासी असलेले सुरेश सुपडू गिरगोसावी (मुलीच्या वडिलांचे मामा), त्यांचा मुलगा शैलेश सुरेश गिरगोसावी आणि ड्रायव्हर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार या तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपळनेरमधील निळकंठ नगरातील तरुणीचा विवाह सोनगड येथील तरुणाशी निश्चित झाला होता. मात्र, साखरपुड्यापासूनच दोन्ही कुटुंबात मानापमानावरून ठिणगी पडली होती. नवरदेवकडील एका तरुणाने याच वादावरून सोशल मीडियावर चिथावणीखोर स्टेटस ठेवले होते, ज्याचा राग वऱ्हाडी मंडळींच्या मनात होता.
advertisement
सहा जण गंभीर जखमी, तिघांचा मृत्यू
गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास लग्नविधी सुरू असतानाच या स्टेटसवरून दोन्ही बाजूचे लोक आमनेसामने आले. नवरदेवकडील काही लोक आधीच तयारीनिशी आले होते, त्यांनी अचानक चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर आणि सागर गोसावी हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर लग्नघरावर शोककळा पसरली आणि वऱ्हाडी मंडळी नवरदेवाला घेऊन पुन्हा सोनगडला परतली.
मध्य प्रदेश-गुजरात सीमेवर नाकाबंदी
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. हल्ल्यानंतर आरोपी कारने गुजरातच्या दिशेने पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून मध्य प्रदेश-गुजरात सीमेवर नाकाबंदी केली. या कारवाईत कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी या तिन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावरील एका किरकोळ स्टेटसचे रूपांतर एवढ्या मोठ्या गुन्ह्यात होईल, अशी कल्पनाही कोणाला नव्हती.
