राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभाग पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या गर्तेत सापडले असल्याचे चित्र आहे. जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये फक्त मार्च महिन्यात 106 आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक 71 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे.
advertisement
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांमध्ये नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि शासनाच्या धोरणात्मक त्रुटी कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, पीक हातचं गेलं तरी हमीभाव नाही, आणि आता तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली "एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा घाट शासनाने घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सर्वाधिक आत्महत्या कोणत्या जिल्ह्यात?
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार शेतकरी आत्महत्यांमध्ये बीडनंतर संभाजीनगर (50), हिंगोली (37), परभणी (33), धाराशिव (31), लातूर (18) आणि जालना (13) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता...
आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ तात्पुरता दिलासा नव्हे, तर दीर्घकालीन धोरणात्मक आधार हवा असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले. सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी पावले न उचलल्यास शेतकरी आणखी गर्तेत अडकेल असेही शेतकरी संघटनांनी म्हटले.