राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले आणि सत्तेत असलेलेही राजकीय पक्ष एकत्र आलेत. नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवरील राजकारणाला आता कोणताही धरबंद राहिलेला दिसत नाही. आता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तर पुढचं पाऊल टाकण्यात आलंय. माढ्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची एनसीपी आणि शरद पवारांची एनसीपी हे चार पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. या चार पक्षांनी भाजपच्या विरोधात त्यांचं एकत्रित पॅनल तयार केलंय.
advertisement
माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वातील हे पॅनल राजकीय मैदानात उतरलंय. मात्र या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यानं एकत्र येण्याचा मुद्दा फक्त स्थानिक पातळी पुरताच मर्यादित असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं. तर स्थानिक राजकारण आणि राज्याचं राजकारण यात फरक असल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेकडून मांडण्यात आला.
भाजपचा टोला
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांची वेगळीच युती तयार झालीय. मात्र मतदारांचा भाजपवर विश्वास असल्यानं या चित्र-विचित्र आघाड्यांचा काहीही फरक पडणार नाही, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला.
राजकीय पक्षांमधील मतभेद कमी झाले?
बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्या. तर माढ्यात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही एनसीपीत हातमिळवणी झालीय. एकंदरीतच एकमेकांपासून दुरावलेल्या राजकीय पक्षांमधील मतभेद कमी होऊ लागल्याचं हे लक्षण आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
