संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. घनसावंगी, अंबड, परतुर, मंठा, जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या आठही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.
Monsoon Tips : पूरजन्य संकटात अडकलात? घाबरू नका, या सोप्या गोष्टी करा फॉलो
advertisement
जालना शहराला संत गाडगेबाबा जलाशयात तसेच नाथ सागर येथून पाणीपुरवठा केला जातो. नवीन जालना शहराला घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा पुरवठा केला जातो. घाणेवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने ते तुडुंब भरलं आहे. धरणात 17 फुटांपर्यंत पाणी जमा झालं आहे. पाणी पातळी 18 फुटांवर आल्यास धरण ओव्हरफ्लो होईल. यामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या पुंडलिका नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. घाणेवाडी जलाशयातून जालना शहराला कोणत्याही प्रकारची वीज न वापरता पाणीपुरवठा केला जातो. यामुळे प्रशासनाची वीज बचत देखील होते. हे धरण तुडुंब भरल्याने किमान जालना शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, सध्या मुंबई, कोकणच आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. विदर्भातही अति मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. अनेक रस्त्यांना नदीचं रुप आलं असून लोकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरलं आहे.





