वर्ध्याच्या प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा
आतापर्यंत वर्ध्यातील नागरिक पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या सारख्या प्रमुख शहरांमध्ये जाण्यासाठी एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांवर अवलंबून होते. मात्र,आता वंदे भारत एक्सप्रेसच्या थांब्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असून प्रवाशांना आरामदायक आणि वेळेची बचत यांचा लाभ घेता येणार आहे. या ट्रेनमध्ये एसी कोच असून स्वयंचलित दरवाजे, रोटेटिंग सीट्स, आधुनिक स्वच्छतागृहे तसेच उच्च दर्जाची सुरक्षा प्रणालीही बसविण्यात आलेली आहे.
advertisement
माजी खासदार रामदास तडस यांचा पाठपुरावा फळाला
वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा थांबा मिळावा यासाठी माजी खासदार रामदास तडस यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले होते. रेल्वे मंत्रालयाशी वारंवार संपर्क साधून त्यांनी या मागणीला गती दिली. स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग आणि विद्यार्थी यांच्याही मागण्या त्यांनी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून वर्धा जिल्ह्यातील नागरिक त्यांचे मनापासून आभार मानत आहेत.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
वंदे भारत एक्सप्रेसच्या थांब्यामुळे वर्धा जिल्ह्यातील व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे,औरंगाबाद आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांशी जलद संपर्क मिळाल्यामुळे स्थानिक व्यवसायांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. विशेषता वर्ध्याच्या कापूस उद्योग, कृषी उत्पादन आणि शैक्षणिक क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल, प्रवासी वाहतूक सेवा तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनाही या निर्णयामुळे अधिक ग्राहक मिळतील. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
या निर्णयानंतर वर्धा शहर आणि परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक या गाडीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहेत.